स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका   

जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा परिषद, तालुका, पंचायत समिती म्हणजे नवीन कार्यकर्ते तयार करण्याचे माध्यम आहे. मात्र, या निवडणुका लांबविण्यात आल्याने जनहिताच्या कामांना दिरंगाई प्रशासक राजकडून दुर्लक्ष झालेच त्याचबरोबर नवीन नेतृत्व तयार होण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.पुणे जिल्हा परिषदेचे पूर्वी ७५ तर पंचायत समितीचे १५० मतदारसंघ होते. मात्र, पुणे शहरानजिकची गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ कमी होऊन ७३ तर पंचायत समितीचे १४६ मतदार संघ आहेत.
 
निवडणूक प्रक्रिया तातडीने राबवा
 
दरम्यान, जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून, आता या निवडणुका कोणतेही कारण न देता पुढे ढकलल्या जाऊ नयेत, अशी भावना कार्यकर्त्यांत आहे. जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक २ असे ४ पक्षांसह भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस हे एकूण ६ पक्ष निवडणुकीच्या मुख्य रिंगणात असतील.
 
न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात उशिरा का होईना, न्याय दिला आहे. ही निवडणूक प्रक्रिया सरकारने तातडीने राबविली पाहिजे. नागरिकांची कामे खोळंबली आहेत. निवडणुका झाल्यावर त्या कामांना गती मिळणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीमध्ये नाही. त्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेेचे माजी अध्यक्ष विश्वास उर्फ नाना देवकाते यांनी दिली.
 
जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन वर्षांपासून झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या हिताची कामे झाली नाहीत. प्रशासकीय काळात कामांना अपेक्षित गती मिळत नाही. त्यामुळे निवडणुका होण्याची गरज होती. न्यायालयाने निवडणुका घेण्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी केले.
 
मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेत आम्ही संघटनेच्या माध्यमांतून एकत्रित येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत भूमिका मांडली होती. ती विविध माध्यमांतून पुढे मांडण्यात आली आणि त्याला यश आले. या निर्णयामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
 
राष्ट्रीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य संघटनेच्या वतीने न्यायालयात चांगली मांडणी झाल्यामुळे न्यायालयाला आमची बाजू समजली. आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने सर्वांनी घेतलेल्या कष्टाला आणि आमच्या भूमिकेला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य संघटनेेच अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी दिली.
 
आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत. या निवडणुका यापूर्वीच होण्याची अपेक्षा होती. परंतु, विद्यमान सरकारला पोषक वातावरण नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या. आताही त्यांना पोषक वातावरण नाही. मात्र, न्यायालयाने निर्णय दिल्याने या निवडणुका घ्याव्या लागणार आहे. आता निवडणुका होण्याची गरज आहे. 
- जगन्नाथ शेवाळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
 
न्यायालयाने निवडणुका घेण्याचा आदेश दिला ही चांगली बाब आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकांसाठी तयार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणुका लढवेल.
- संजय जगताप, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या संघटनेच्या माध्यमांतून मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. निवडणुकीबाबत निर्णय यापूर्वीच घेणे अपेक्षित होते. निवडणुका न झाल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  अनेक योजनांना त्याचा फटका बसला आहे. 
- शरद बुट्टे पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप 
 
अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यकर्ते वाट पाहत होते. यापूर्वीच या निवडणुक होण्याची गरज होती; पण आता निर्णय झाला आहे. आमचा पक्ष निवडणुकांसाठी तयार आहे. पक्षाच्या वरिष्ठांचे पालन होऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे. 
- रमेश बापू कोंडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

Related Articles